
रायगड (Raigad News) परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi) काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला. झोपण्यासाठी रात्री शाळेत गेल्यानं हे तरुण सुदैवानं बचावले, पण त्यांचे कुटुंबिय मात्र बेपत्ता आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे.
Khalapur Irshalgad Landslide Update, irshalwadi ghatana, irshalwadi update news, raigad landslide news.
घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. अद्याप 100 ते 120 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव सांगितला. इर्शाळवाडीतील 6 तरुण ही शाळेत रात्री साडेदहा ते 11 च्या दरम्यान झोपण्यासाठी गेली होती. दरड कोसळल्याचा आवाज तरुणांना आले आणि ते धावत डोंगराच्या पायथ्याशी आले. मात्र त्यांचे आई-वडील कुटुंबिय मात्र या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं तरुण कासावीस झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे तरुण सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरीदेखील आपल्या नातेवाईकांच्या ख्याली-खुशालीसाठी तरुणांचा आक्रोश सुरूच आहे. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विवंचना वारंवार तरुण पोलिसांकडे करत आहेत.
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, ९३ जणांना वाचवलं!
अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली आहे. मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मदत कार्यासाठी पुढे सरसावलेल्या संस्था- स्वयंसेवकांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
तात्पुरत्या पुनर्वसनासाठी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे
इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
राजकीय नेत्यांनीही तिथे जाणं टाळायला हवं – आदित्य ठाकरे
दुर्घटनाग्रस्त ठिकाणी जाणं राजकीय नेत्यांनी किंवा इतर लोकांनीही जाणं टाळलं पाहिजे. तिथे सापडणाऱ्या जखमींना खाली आणण्यात त्यामुळे अडथळे निर्माण होता कामा नयेत – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले…
या स्थितीत आपण सगळ्यांनीच जे काही शक्य आहे ते सगळं केलं पाहिजे. मी अंबादास दानवेंशी मी सकाळपासून बोलतोय. स्थानिक शिवसैनिकांशीही बोलतोय. सरकारी यंत्रणा आणि एनडीआरएफ इथे सकाळपासून मदतकार्य करत आहे. वातावरणातले बदल आपल्याला दिसत आहेत. अवकाळी पाऊस, गारपिटी, दुष्काळ, अतीपाऊस या घटना विचित्र आहेत. त्यावरच्या उपाययोजनांसाठी आपण तयार राहायला हवं – आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री प्रत्यक्ष घटनास्थळाच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ७ वाजता इर्शाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते. आता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पायथ्यापासून चालत निघाले आहेत.
#इर्शाळवाडीदुर्घटना
पाऊस, धुके आणि निसरडा रस्ता… यंत्रसामग्री पोहोचणे कठीण असले तरी त्याची पर्वा न करता मुख्यमंत्री @mieknathshinde हे स्वतः चालत इर्शाळवाडी घटनास्थळी पोहोचत आहेत… pic.twitter.com/cKrF8z7PF8— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
अर्थ मूव्हींग मशीन घटनास्थळी नेण्याचे प्रयत्न चालू – फडणवीस
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह आढळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः पोहोचले आहेत. ज्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या तेथे मंत्री गिरीश महाजन आणि आ. महेश बालदी हे मध्यरात्रीच पोहोचले. ते दोघेही स्वतः मदत कार्यात आहेत. पाऊस आणि हवामानामुळे मदत कार्यात अडचणी असल्या त्यातून मार्ग काढला जात आहे. गेल्या 3 दिवसात सुमारे 499 मिमी पाऊस येथे झाला आहे. एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. दोन ‘अर्थ मुव्हींग मशिन’ तेथे एअरलिफ्ट करता येतात का, याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनीही फोनवर संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.
इर्शाळवाडीत गर्दी न करण्याचं सरकारचं आवाहन
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तेथे मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती…
रात्री एकच्या सुमारास आमच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर याची माहिती आली. आमची दोन पथकं तातडीने घटनास्थळी निघाली. पहाटे तीनच्या सुमारास आमची पथकं पायथ्याला पोहोचली. पहाटे चारच्या सुमारास आमची चार पथकं वर गावात पोहोचली. तेव्हापासून या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटच्या माणसाला इथून वाचवल्याशिवाय आम्ही इथून निघणार नाही – एनडीआरएफ अधिकारी